हिंगोलीतील शेतकऱ्यांचा संताप मदतीची रक्कम गोरेगाव अप्पर तहसील समोर फेकून सरकारचा निषेध
हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण पिक उध्वस्त झाले असून शासनाने जाहिर केलेली 8500 रुपयांची मदत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी ता. 10 सकाळी गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर फेकून दिली. यावेळी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, हळद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचा हाती आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. काही ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीचा खर्चही करणे कठीण झाले आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च कसा करावा तसेच रब्बी हंगामात पेरणी करण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या परिस्थितीत शासनाने हेक्टरी 8500 रुपयांची मदत जाहिर केली आहे. मात्र सोयाबीनचा एकरी काढणीचा दर 4000 रुपये असून त्या शिवाय मळणी व वाहतुकीचा खर्च वेगळा करावा लागत आहे. त्यामुळे शासनाकडून मिळत असलेली मदत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांतून संतापाची भावना निर्माण झाली आहे.सध्या शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मदत जमा केली जात आहे. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 हजार ते 17000 रुपये जमा केले जात आहेत.
सदरील मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करीत
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, रमेश जाधव, राहुल कावरखे, पिंटू रोडकर, पांडुरंग कावरखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी गोरेगाव अप्पर तहसील कार्यालयासमोर एकत्र येऊन शासनाने दिलेल्या मदतीची रक्कम तहसील कार्यालयासमोर फेकून दिली. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतातील 100 टक्के पिकांचे नुकसान झाले असतांना ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे अपेक्षीत होते. मात्र शासनाकडून कर्जमाफीबाबत कुठलाही निर्णय घेतला जात नसल्याने यापुढे आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.













