प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली,मराठवाडा साहित्य परिषद, शाखा हिंगोली तर्फे दिनांक २८ जून रोजी शनिवारी नूतन साहित्य मंदिर वाचनालय, हिंगोली येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी म सा प हिंगोली शाखेचे अध्यक्ष, जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापुरकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म सा प केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्राचार्य नामदेवराव वाबळे हे होते. कवी संमेलनाचे प्रास्ताविक हिंगोली शाखेचे कार्यवाह दिलीप धामणे यांनी केले. यामध्ये त्यांनी हिंगोलीतील साहित्यिक चळवळीला उत्तेजन देण्यासाठी असेच विविध उपक्रम राबविण्यासाठी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन श्री रतन आडे यांनी ओघवत्या, रसाळ, संवादात्मक पद्धतीने केले.
सहभागी कवी कवयित्रींनी विविध विषयांवर आपल्या कविता सादर केल्या. विशेषतः पाऊस, निसर्ग, वारी, प्रेम, लेक, शेतकरी, शिक्षण यासंबंधी कविता होत्या.
नामेदवराव वाबळे यांनी ‘पाऊस चिमण्या पाखरांच्या चोचितला घास
दडून बसला की हमखास गळफास’ ही भीषण वास्तव मांडणारी कविता सादर केली.
कलानंद जाधव यांनी दिंडी:-
माय लेकी भेटीसाठी,
अतुर झाल्या झुंडी,
पाय चालती टाळ बोलती,
विठ्ठल विठ्ठल तोंडी,
दिंडी चालली,नामा ज्ञानोबाची,दिंडी’
ही कविता सादर करून भक्ती रसात न्हाऊन टाकले.
रतन आडे यांनी ‘गोड हसली, कधी न रुसली
शुभ्र तारका सोजी
फुल असुनी, फुलात बसुनी
फुलास असते राजी… राजी
असी लाडकी माझी’, ही लेकीवरची कविता सादर केली.
सुमन गोपाल दुबे यांनी ‘नाथ, मेरे ले संदेश श्याम रंग बादल भिजवाऊँ ।
मैं राधा रुक्मिणी ना मीरा क्या पहचान बताऊँ ।’ तर
संगीता चौधरी यांनी ‘तू असावा माझ्यासवे’ ही भावपूर्ण कविता तर
डॉ. राधिका देशमुख यांनी बहुरुपी
‘कधी कधी माझे च शब्द होतात निशब्द.
अव्यक्त भाव मनाचा व्यक्त करून जातात.
कधी कधी माझे शब्द करतात सांत्वन.
दुसऱ्यांबद्दल करते जेव्हा मी माणुसकीने चिंतन.’ एक मनोभाव चित्रित करणारी कविता सादर केली.
आश्विनी देशमुख यांनी ‘काळ्या मातीच्या कुशीत, ज्वाला पोटात निघत’ ही शेतकऱ्याच्या जीवनावरची कविता सादर केली.
पारिजात देशमुख यांनी ‘विठ्ठला तुझ्या भेटीची आस
जीव झाला कासावीस,
कधी येते ही पंढरी
जीवा पडेना उसास’ ही भक्तीमय रचना सादर केली.
राजकुमार मोरगे यांनी ‘आषाढ महिना l मृगाचा पाऊस
पेरीचे दिवस l बळीराजा ll ही शेतकऱ्या वरची अर्थपूर्ण कविता सादर केली.
विजय गुंडेकर यांनी ‘नरकाच्या पल्याड
देखण्या अशा बांधलेल्या
बंगल्यातील रंगीबिरंगी
चार भिंतीच्या आतही’ ही दुःखद वास्तव चित्रण करणारी कविता सादर केली.
समाधान लोणकर यांनी पावसाच्या ओल्या सरी
चिंब करती मनामनाला
अत्तराचा मधुगंध येतो
मातीच्या कणाकणाला’ ही कविता
तर डॉ. निखिल नायक यांनी ‘गाव तसं चांगल,
चलती पाटिल अन् रावांची,
ऐका ऐका हो कहानी,
सवना या गावाची’ ही शिक्षणाचे वास्तव चित्रण करणारी
गोडाती काळे यांनी ‘लेक…..!
“लेक असते बापासाठी,
त्याच्या काळजाचा तुकडा,
जाता घर सोडून,
मनाचा होई पार सुकडा…!” ही लेकी वरची डोळे पानावणारी कविता सादर केली
बालाजी शेळके यांनी ‘पाऊस आला की राणी तुझी आठवण येते
जणू हा पाऊस राणी तुझेच गीत गाते’ ही प्रेम कविता तर
डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांनी ‘आम्ही आता मोठे झालो,
मोठमोठ्याहूनही मोठे झालो’ ही उपहासात्मक कविता सादर केली.
दिलीप धामणे यांनी ‘तुझ्या नाजूक हास्यात
दिसे दाणे डाळींबाचे
नेसता हिरवा शालू
जणू फूल सोनचाफ्याचे’ ही प्रेमकविता सादर केली.
कवी संमेलनाच्या शेवटी नामदेवराव वाबळे यांनी मराठवाडा साहित्य परिषदे च्या विविध उपक्रमांची माहिती दिली तर अध्यक्षीय समारोपात अशोक अर्धापूरकर यांनी हिंगोलीतील भावी काळातील विविध साहित्यिक उपक्रमां विषयी तसेच कवी कालिदास यांच्या विषयी व सर्वांच्या कवितांविषयी भरभरून अभिप्राय दिला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथपाल संतोष ससे व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.













