हिंगोली प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे
हिंगोली :बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, सेनगाव तालुक्यातील सहा गावांतील १०० ते १५० हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. नदीकाठची शेतजमीन खरडून गेल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. भगवती गावाजवळ पाणी पुलावरून वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक २४ तासांपासून ठप्प होती
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव भागात २६ जून रोजी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीने पैनगंगा नदीला पूर आला आहे. सेनगाव तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते. तालुक्यातील भगवती, गारखेडा,तपोवन, गुगुळ पिंपरी, सुरजखेड़ा आदी गावांतील शेजमिनीत नदीचे पाणी शिरले असून, जमिनी पाण्याखाली आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच सोयाबीन पेरणी केली होती. पुरामुळे पिके खरडून गेली आहेत. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. दरम्यान, माझोड सज्जाचे तलाठी एन. जी. ढोले यांनी शेतीची पाहणी केली.
*विदर्भाकडील वाहतूक ठप्प*
सेनगाव तालुक्यातील भगवती गावाजवळ पैनगंगा नदीवर कमी उंचीचा पूल आहे. २६ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास हा पूल पाण्याखाली गेला आहे. २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुलावर ४फुटापर्यंत पाणी होते.’त्यामुळे या पुलावरील वाहतूक ठप्प आहे. गोरेगावकडून वाशिमकडे जाण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांसाठी हा सोयीचा मार्ग आहे.













